मुक्ताईनगर : येथे नगरपंचायत स्थापन होऊन चार वर्षे झाली तरी अद्याप तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीत समावेशन करण्यात आले नाही. तरी या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत प्रशासन असूनसुद्धा त्यांचे समावेशन नसल्याने सुविधांचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्व नगरपंचायत व नगरपालिकांचे समावेशन झाले आहे. जिल्ह्यात मुक्ताईनगर ही एकमेव नगरपंचायत अशी आहे की, ज्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. त्यामुळे शासन नगरपंचायत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. नगरपंचायत अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा उदा. शाळा, हॉस्पिटल रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व इतर मूलभूत सुविधांपासून मुक्ताईनगर शहरातील जनतेला सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार हा मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या माध्यमातून जी कर कसुली होते त्या करामधून दिला जातो. चार वर्षाला जवळपास १ कोटी ४४ लाख इतका पगार हा मुक्ताईनगर नगरपंचायतीद्वारे दिला गेला. जर मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाने वेळीच कर्तव्यदक्षता दाखविली असती तर करोडो रुपयांचा निधी हा मुक्ताईनगर शहराच्या विकासासाठी वापरता आला असता, असा आरोपही सोनवणे यांनी केला आहे.