लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत योजने अंतर्गंत पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी खड्डे खोदण्यात आल्यानंतर, आता पुन्हा नळ जोडणीसाठी घरासमोर खड्डे खोदण्यात येत आहेत. खड्डे आणि दगड-गोट्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले असून, अमृतच्या कामाचा अक्षरश : वैताग आला असल्याच्या भावना रिंगरोडवरील रहिवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या रिॲलिटी चेक दरम्यान व्यक्त केल्या. तसेच हे काम करताना मनपातर्फे कुठलेही नियोजन न करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून मनपाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने अमृत अंतर्गंत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सध्या विविध भागात हे काम सुरू आहे. नळ कनेक्शन देण्यासाठी पुन्हा रस्ते खोदण्यात येत आहे. या कामासाठी तीन ते चार फुटांपर्यंत खड्डे खोदण्यात येत असून, संबंधित मक्तेदारातर्फे एका दिवसात हे काम पूर्ण करण्यात येत आहे. सध्या रिंगरोडवर दोन्ही बाजूला हे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे पुन्हा रस्त्याची दुरवस्था होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, व्यवस्थित दुरुस्ती न केल्यामुळे आजही त्रास सहन करावा लागत आहे. आता पुन्हा नळ जोडणीसाठी खोदाई करण्यात येत असल्यामुळे या कामाचा त्रास आणखी किती दिवस सहन करणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
इन्फो :
तर पाईपलाईन टाकतानाच नळ जोडणी करायला हवी होती
सध्या रिंगरोडवर नळ जोडणीसाठी खड्डे खोदण्यात येत असून, दोन्ही बाजूला प्रत्येक घरासमोर हे खड्डे खोदण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी अमृतची पाईपलाईन टाकल्यानंतर, त्याचवेळेस नळ जोडणी करायला हवी होती. त्यामुळे पुन्हा रस्ते खोदण्याचा प्रश्न राहिलाच नसता, असा सूर येथील रहिवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
अमृतची पाईप लाईन टाकल्यानंतर आता नळजोडणी करण्यात येत आहे. नळ जोडणीसाठी खड्डे खोदून तत्काळ बुजविण्यात येत आहे. संपूर्ण शहरात हे काम केले जात आहे.
आकाश दुबे, पर्यवेक्षक.
::
इन्फो :
नळजोडणीसाठी पुन्हा खड्डे खोदण्यात येत असल्यामुळे, रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत आहे. मनपाने पाईपलाईन टाकतानाच नागरिकांना या ठिकाणी नळ कनेक्शन द्यायला हवे होते. ज्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागला नसता.
सुरेश पाटील, रहिवासी.
इन्फो :
अमृतसाठी करण्यात येणाऱ्या खोदाईला विरोध नाही. मात्र, खड्डे खोदल्यानंतर ते व्यवस्थित रित्या बुजविले जात नाही. रस्ता खालीवर होऊन, अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
नितीन माळी, व्यावसायिक