जळगाव : आगामी खरिपाची तयार करण्यात शेतकरी व्यस्त आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून, एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात १६ पासून अवकाळी पावसाचा अंदाज
जळगाव : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, हे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. यामुळे १६ मे पासून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १६ ते २१ मे दरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीदेखील निसर्ग वादळामुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षीदेखील वादळामुळे मान्सूनपूर्व पावसाचे आगमन जिल्ह्यात होणार आहे.
मनपासमोर गाळेधारकांचे आंदोलन
जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत महासभेत धोरणात्मक निर्णयाविरोधात गाळेधारकांनी महानगरपालिकेसमोर कुटुंबीयांसह आंदोलन केले. यावेळी पंकज मोमाया, रिझवान जहाँगीरदार, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, संतोष अत्तरदे, अशपाक अन्सारी, दिलीप साळुंखे, वसंत भावसार, बापू कोल्हे, अमोल वाणी, किशोर सोनवणे, गोपाल बजाज, कमल तलरेजा, दिनेश वालेचा, शंकर वदवानी, मीनाक्षी सपकाळे, सलोनी परदेशी, आदी गाळेधारक उपस्थित होते. मनपा प्रशासनाने शासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही. तोपर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेऊ नये. तसेच जे १६ अविकसित, अव्यावसायिक मार्केट आहेत. त्या मार्केटमध्ये अडीच ते तीन टक्के भाडे आकारणी करावी. पाचपट दंड रद्द करावा, अशी मागणी जळगाव शहर मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी केली आहे.
अक्सा नगरातील बाजार उठविला
जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील नगर भागात दर बुधवारी भरणारा बुध बाजार मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी उठवून लावला. गेल्या आठवड्यात या बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक व विक्रेत्यांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली होती. बुधवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी सकाळपासून ठाण मांडत या ठिकाणी बाजार भरू दिला नाही.