संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात बिहार पॅटर्नअंतर्गत वृक्षलागवडीच्या चळवळीसोबतच समृद्ध योजनेत बांबू लागवड चळवळ रुजू लागली आहे. स्वातंत्र्य दिनापासून ३९ गावांमध्ये ११,५०० बांबू लागवड करण्यात आली आहे.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत नाला खोलीकरण, शेतात बांध बांधणे आदी योजना राबविण्यात आल्या होत्या. त्याला पूरक योजना म्हणून जलमित्र, शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने बांबू लागवड करण्यात येत आहे. सुमारे दीड लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ बांबू लागवड चळवळही फायदेशीर ठरणार आहे.
तालुक्यातील दहिवद येथे २,०००, दापोरी बुद्रुक - ८००, पातोंडा- १५०, गांधली- ४,०००, मंगरुळ - ४००, वासरे- २००, जवखेडा - ४,००० असे एकूण ११ हजार ५५० बांबूंची लागवड करण्यात आली आहे. वनविभाग व सामाजिक वनीकरण यांच्याकडून रोपे मागवून ही चळवळ उभारण्यात आली आहे. यानंतर, आनोरे ५००, नगाव खुर्द ७५०, नगाव बुद्रुक २००, गांधली ५००, डांगर बुद्रुक ७५० असे २,७५० बांबू लागवड प्रस्तावित आहे.
दापोरी बुद्रुक गावात नाला खोलीकरण व रुंदीकरण केले होते. शेतातील नाल्यात वाहून जाणारे पाणी सोबत माती वाहून घेऊन जाऊ नये, म्हणून नाल्याच्या काठावर १,००० बांबू लागवड करण्यात आली.
बांबू लागवड चळवळ
सर्वसाधारणपणे नाला खोलीकरण, बांध बंदिस्ती, यामुळे पाणी सिंचन, साठा वाढविला जातो. मात्र, वर्ष दोन वर्षांत आजूबाजूच्या परिसरातील शेतातील माती वाहून बांध नाहीसे होतात व नाले बुजले जातात, त्यावर उपाय म्हणून बांबू लागवड योजना आहे.
कोट
शेताचा बांध अथवा नाल्याच्या काठावर बांबू लागवड केल्यास, त्याची मुळे माती धरून ठेवतात. परिणामी, पाणी वाहिले तरी मृद संधारण होते. बांबू वाढल्यानंतर त्यातून शेतकऱ्याला ते उपयोगी पडून काही प्रमाणात उत्पन्नही मिळते.
- सुनील पाटील, तालुका समन्वयक, अमळनेर.
फोटो ओळी: दापोरी बुद्रुक येथे नाल्याच्या काठावर बांबू लागवड करताना जलमित्र व समाजसेवक.
छाया अंबिका फोटो