जळगाव : करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी पालकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. पालकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय जीवनात आपण काही करू शकत नाही. योग्य वयात योग्य गोष्ट केल्यास जीवनात यशस्वी होणे अवघड नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथे केले. आशा फाउंडेशनतर्फे आयएमआर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर आयएमसीसी महाविद्यालयाच्या स्वप्नजा पटवर्धन (पुणे), आयएमआर कॉलेजचे संचालक डॉ.विवेक काटदरे, गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, की आपल्याला काय व्हायच आहे, हे आपण ठरविले पाहिजे. त्यानुसार आपली जीवनशैली विकसित केली पाहिजे. युपीएससीची तयारी करताना प्रथम मुलाखतीची तयारी करा, असा सल्लाही त्यांनी येथे उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. दिवसभरात कॉम्प्युटरमधील करिअरबाबत स्वप्नजा पटवर्धन, सीए/सीएसबाबत यावर डॉ.काटदरे यांनी माहिती दिली. दुपारच्या सत्रात अँड हेमंत मुदलीयार, वैद्यकीय क्षेत्रासाठी पूरक असलेल्या अभ्यासाक्रमाची माहिती अविनाश सावळे यांनी दिली. १0 रोजी सकाळी ९ वाजता इंजिनीअरिंग, १0 वाजता पत्रकारिता या करिअर क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.