भुसावळ : कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर येथील पाचशे मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. सध्या केवळ संच क्रमांक चार हा एकमेव संच कार्यरत आहे. राज्याची विजेची मागणी २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक असताना कोळसा टंचाईमुळे संच बंद (शटडाऊन) करण्यात आल्याने आपत्कालीन भारनियमन वाढण्याची भीती आहे.बुधवारी दीपनगर केंद्रात १८ हजार मेट्रीक टन अर्थात केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा शिल्लक होता.दोन दिवसांत या साठ्यातही घट झाली आहे. त्यामुळे कोळशाचा साठा केवळ सात ते दहा हजार मेट्रीक टनांवर पोहचला. यामुळे रविवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दीपनगर प्रशासनाने वीज निर्मिती करणारा संच क्रमांक पाच हा बंद करण्याचा निर्णय घेतला. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे दोन संच कार्यरत असून २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन सध्या एमओडीमुळे बंद आहे. १२१० मेगावॅट स्थापित क्षमतेच्या तुलनेत किमान ९८८ मेगावॅट वीजनिर्मिती होणे अपेक्षीत आहे.मात्र कोळशाच्या टंचाइमुळे संच क्रमांक पाच बंद करण्यात आल्याने सध्या केवळ संच क्रमांक चारमधून वीज निर्मिती होत आहे.आठ हजार मेट्रिक टन कोळशाची मागणी केली दोन ते तीन दिवसात पूर्तता होईल व संच क्रमांक पाच सुरु होईल.- राजेंद्र बावस्कर, दीपनगर वीजनिर्मिती मुख्य अभियंता
दीपनगरचा पाचव्या क्रमांकाचा वीज निर्मिती संच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:24 IST
कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर येथील पाचशे मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.
दीपनगरचा पाचव्या क्रमांकाचा वीज निर्मिती संच बंद
ठळक मुद्देदीपनगर केंद्राला कोळसा टंचाईचा फटकाकेवळ संच क्रमांक चार कार्यरतएक दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक