जळगाव : विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी खान्देश विकास आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. अर्थातच उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत, परंतु नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची यावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनीष जैन आणि भाजपातर्फे माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांची नावे चर्चेत असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये इतर नावेही पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जि.प.सदस्य मंगेश पाटील आणि संजय पवार यांनीदेखील निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे अर्ज दिला आहे. त्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी पक्षाचे महासचिव यांच्याशी चर्चा केली आहे. पण पक्षाने जैन, पाटील व पवार यांच्यापैकी कुणाच्याही उमेदवारीची घोषणा अजूनही केलेली नाही, असे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक म्हणाले.
खाविआतर्फे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारांची यादी ताब्यात घेऊन त्यादृष्टीने कामही सुरू केले आहे.
डॉ.गुरुमुख जगवानी यांचे नाव पुढे असले तरी यानंतर गोविंद अग्रवाल, संजय जैन, माजी जि.प. सभापती पी.सी.पाटील, अनिल चौधरी यांनीदेखील पक्षाकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौधरी हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपात दाखल झाले. त्यावेळेस भाजपाला त्यांची मदत झाली. आता पुढे विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. यामुळे त्यांची कुठेतरी वर्णी लावावी लागेल, असा विचार भाजपातील श्रेष्ठींमध्ये आहे. त्यांच्यासाठी आमदार गिरीश महाजन यांचा आग्रह आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ.जगवानी यांच्यासाठीदेखील पक्षात पाठबळ लावले जात आहे. अर्थातच भाजपात दोन नेत्यांची दोन वेगवेगळी मते आहेत.
भाजपाची जिल्हा बैठक होणार
यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेगवेगळ्य़ा नावांची चर्चा असली तरी अजून कुणाचेही नाव निश्चित केलेले नाही. येत्या एक दोन दिवसात भाजपाची जिल्हा बैठक होऊन त्यात दोन नावे निश्चित करून त्यासंबंधीची शिफारस राज्याच्या निवड समितीला केली जाईल.
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ
विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सूचना जारी केली आहे. त्यात नामनिर्देशनपत्र उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम यांच्याकडे १७ पासून तर २४ तारखेपर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी २७ जून ही तारीख असून, दुपारी ३ वाजेपर्यंत त्यासंबंधीची लेखी सूचना देता येईल. ११ जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल.