लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : देशात एकीकडे उत्तरोत्तर विकास व प्रगती होत असल्याचा केंद्र शासनाकडून कांगावा करण्यात येत असून, दुसरीकडे रेल्वेचे खासगीकरण करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत रेल्वेचे खासगीकरण होऊ द्यायचे नाही, यासाठी सीआरएमएस रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारी डीआरएम कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला.
रेल्वेच्या खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध करत सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे १३ ते १८ सप्टेंबर दरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह सुरू आहे. मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधिया, मंडळ सचिव एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वात भुसावळ येथे प्रत्येक डेपोत जाऊन गेट मिटिंगद्वारे कामगारांनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाबद्दल विरोध केला. रेल्वेचे खासगीकरण हे रेल्वेच्या व रेल्वे कामगारांच्या हिताचे नाही. यातून देशाचेही मोठे नुकसान होईल म्हणून रेल्वे कामगारांनी असा विरोध करून रेल्वे वाचविण्यासाठी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधिया, मंडळ सचिव एस. बी. पाटील, कार्याध्यक्ष तिवारी, समन्वयक एस. के. दुबे, संघटक पी. के. रायकवार यांनी कामगारांना संबोधित केले.
आंदोलन यशस्वीतेसाठी नंदकिशोर उपाध्याय, अमरसिंह राजपूत, उमाकांत बावस्कर, पी. के. गुप्ता, किशोर कोलते, विशाल खरे, सुरेश लखोरे, अजय मालवीय, दीपक शर्मा, अय्युब खान, अजित आमोदकर, गणेशसिंग अजित रंधावा यांनी परिश्रम घेतले.