जळगाव : परीक्षा म्हणून सकाळीच आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. पण, परीक्षा सुरू होणार, तेवढ्याच पेपर रद्द झाल्याचा संदेश प्राप्त झाला. यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला.
जिल्ह्यातील आयटीआयच्या ऑनलाइन परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार होती. सकाळी १० ते दुपारी १ तर दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे दोन सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी प्रात्यक्षिक आणि गणिताचा पेपर होणार होता. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी त्या-त्या आयटीआयच्या केंद्रांवर हजेरी लावली होती. मात्र, तेवढ्यातच दिल्ली डीजीटी कार्यालयाकडून तांत्रिक कारणामुळे गुरुवारचा पेपर रद्द करण्यात आला असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. लांबवरून आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला. बहुतांश विद्यार्थ्यांना हॉलतिकीटसुद्धा मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, २९ पासून नियमित परीक्षा सुरू राहणार असल्याचे आयटीआयच्या प्राध्यापकांनी सांगितले.