जामनेर : विधानसभा निवडणुकीचा बिगुलवाजल्यानंतरही अद्याप आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा नसल्यानेकार्यकर्त्यांतही चलबिचल आहे. तर दुसरीकडे विधानसभा प्रतिनिधित्वाचे पंचक पूर्ण करण्यासाठी आमदार गिरीश महाजन तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
२00९ च्या विधानसभा निवडणुकीत जि.प. सदस्य संजय गरुड यांनी जोरदार टक्कर दिल्याने निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. केवळ साडेसात हजारांच्या मताधिक्याने झालेला विजय भाजपालाही विचार करायला लावणारा होता. यामुळेच या निवडणुकीची भाजपाने परिपूर्ण तयारी केलेली आहे. मराठाबहुल असलेल्या या मतदारसंघात मराठा उमेदवार देण्यावर आघाडीचा भर आहे. यामुळे काँग्रेसमधील चौघा इच्छुकांपैकी डिगंबर पाटील यांना अधिक पसंतीदिली जात आहे. यामुळे त्यांचेच तिकीट निश्चित होईल, अशीच चर्चा कार्यकर्त्यांत आहे. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या संजय गरुड यांनीही पाटील यांच्यासाठी माघार घेतली आहे.
१९९५ पासून भाजपाचा बालेकिल्ला झालेल्या या मतदारसंघाला भेदण्यासाठी काँग्रेसही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. डिगंबर पाटील यांनीही तालुक्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पण उमेदवाराचे नाव निश्चित होत नसल्याने थोडी चलबिचल आहे. तर दुसर्या बाजूलाभाजपातर्फे गटप्रमुख, गणप्रमुख, बूथप्रमुख यांच्या बैठका होऊन मतदार याद्याही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्या आहेत. आमदार गिरीश महाजन यांचा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत असलेला थेट संपर्क, सुखा-दु:खाच्या क्षणात त्यांची होणारी भेट ही त्यांची बलस्थाने आहेत. त्यात त्यांची आरोग्यसेवा पुरवण्याबाबत जामनेर- जळगाव- मुंबईपर्यंत असलेली यंत्रणा, भाजपाकडे सामान्य कार्यकर्त्यांची असलेली मोठी फळी, जि.प.च्या सातपैकी सहा जागांवर असलेले प्रतिनिधी, पं.स.च्या १४ पैकी १0 जागा, ७0 टक्के ग्रामपंचायती ताब्यात असल्याने तालुक्यात भाजपा विरोधकांपेक्षा वरचढच आहे.
आमदार महाजन यांच्यासह कार्यकर्तेही जनतेच्या सतत संपर्कात रहात असल्याने त्यांना मोठा फायदा होतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
राज्यात १५ वर्षांपासून आघाडीचीसत्ता असली तरी मतदारसंघातील भाजपाविरोधकांना नेहमी संपर्कात राहून कामे करणे जमलेले नाही. त्यात डिगंबर पाटील तोंडापूर, तर संजय गरुड शेंदुर्णीला रहात असल्याने त्यांचा शहरातील संपर्क तुटतो.
त्याचवेळी जामनेर तालुक्याचे मुख्यालय असल्याने समस्या, अडचणी घेऊन नागरिक येथेच येतात. दीड वर्षापूर्वी आघाडीने एकी करून न.पा. ताब्यात घेतली.मात्र त्यातही दोन गट होऊन कलगीतुरा रंगला. नंतर सारवासारव झाली. मात्र ती टिकावू वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत तर तालुक्यात भाजपाला आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळाले. ३९ हजारांचे मताधिक्य रक्षा खडसेंना मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे. त्यात राज्यात युतीचे शासन आल्यास आमदार महाजन यांना मंत्रिपद मिळणार. याच आकांक्षेने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे विद्यमान आमदारांना शह देणे काँग्रेससाठी कडवे आव्हान ठरणार आहे.