लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी या अर्थसंकल्पात चांगल्या घोषणा झाल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याच्या प्रतिक्रिया शेती पूरक उद्योग क्षेत्रातून उमटत आहे. दुसरीकडे सुवर्ण व्यवसायावर जीएसटी कमी करणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने हा भार कायम राहणार आहे. मात्र आयात शुल्कात कपात केल्याने सोने-चांदीचे भाव कमी होण्यास मदत मिळून व्यवसाय वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन
कोरोनाची साथ, लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सामान्य माणूस सापडला आहे महामारीच्या महासंकटामुळे अडकलेले अर्थचक्र पूर्ववत गतिमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा वाटतो. आयकर रचनेत कोणताच बदल न करता सामान्य नागरिकाला आणि शेतकऱ्यांसाठी काही मोलाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्याचा याही वर्षाच्या अर्थसंकल्पात संकल्प केलेला आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात कृषिक्षेत्रासाठी एकूण १६.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या दीडीपट भाव देणे, कृषी कर्जासाठी १७.५ लाख कोटी रुपयांची तरतूद, सूक्ष्मसिंचनासाठी १० हजार कोटी रुपयांची तसेच सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद, देशात ७ नवीन टेक्स्टाईल पार्क उभारणे, तांदूळ, कापूस आणि दाळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. हा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह जळगाव.
सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केल्याने त्याचा लाभ व्यावसायिकांसह ग्राहकांनाही होणार आहे. शिवाय भाव कमी होण्यासही मदत होणार असल्याने व्यवसाय वाढीस चालना मिळेल. मात्र जीएसटीचा भार तसाच ठेवला आहे. तो कमी होणे आवश्यक होता.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.