भुसावळ : भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे समुपदेशन करून तुटणारा संसार पुन्हा जोडण्यात यश आले आहे. बाळासह मुलीला आनंदाने सासरी पाठवण्यात आले.
केतन दिलीप चौधरी (नाशिक) व वीणा (कटोरी, जि. बालाघाट) यांचा विवाह दि. १५ जून २०१९ रोजी झाला होता. लग्नानंतर दोघांमधे कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच वीणाला बाळ झाल्यावर कुरबुरी संपुष्टात येतील, असे वाटले. पण झाले उलटेच. मुलगी झाल्यावर मतभेद अजूनच वाढले व वीणा बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. भोर पंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी आलेली होती. तेव्हा समुपदेशन करून लग्न वाचवण्याचा प्रयत्न करू, असे वीणाच्या संमतीने ठरले. समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी वीणा व केतन दोघांशी बोलून समजावून सांगितले. दोघांनाही एकमेकांच्या चुकांबद्दल सांगून एकत्र येण्यासाठी समजावले. दोघेही आनंदाने संसार करण्यासाठी तयार झाले. आवश्यक ती कागदपत्रे तयार करून कार्यालयातूनच वीणाची सासरी पाठवणी केली.
याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, सुहास चोधरी, परीक्षित बऱ्हाटे व समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी हजर होते.