अशोक परदेशी ■ भडगाव
पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या मागील वर्षीच्या पुनर्रचनेनंतर आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ नावारूपाला आला. भडगाव तालुका सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहिला. तालुका लहान असल्याने नेतृत्वाची संधी न मिळाल्याने हा तालुका विकासापासून लांब असल्याचे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे.
तालुक्यातील ६३ गावांपैकी १६ गावे एरंडोल मतदारसंघास जोडली गेली. आमडदे, गिरड जि.प. गटातून एरंडोल मतदारसंघातील ही गावे असून या १६ गावांचे २६ हजार ६९१ मतदान आहे. हे मतदान कमी झाल्याने नुकसानकारक ठरत आहे. तालुक्याचे एकूण मतदान १ लाख २६३ असून यात पुरुष ५३ हजार २५३, स्त्री मतदार ४७ हजार ११ आहेत. एकूण १0७ मतदान केंद्रे असून त्यात ४७ गावांचा समावेश आहे. इतर सर्व गावे पाचोरा मतदारसंघाशी संलग्न आहेत. या निवडणुकीत तालुक्याची मतेच निर्णायक ठरणार आहेत.
हा मतदारसंघ पाचोर्याशी तर संयुक्त आहेच पण बाजार समितीदेखील संयुक्त आहे. स्वतंत्र बस आगार नसून सर्व बसेस पाचोरा आगारातून सुटतात. प्रांत कार्यालयही पाचोरा येथे आहे. हा शेती व्यवसायाशी निगडित तालुका असून राजकीयदृष्ट्या उपेक्षितच आहे. नेतृत्वाची संधी न मिळाल्याने तालुका विकासाला मुकला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत दिलीप वाघ व किशोर पाटील यांच्यात सरळ लढत झाली होती. तालुक्याचाच आमदार पाहिजे, अशी सर्वपक्षीय मागणी होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची आघाडीत बिघाडी झाली तर शिवसेना-भाजपाची युती तुटली. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. आता लढत पंचरंगी होणार आहे. राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, तर भाजपाचे डॉ.उत्तमराव महाजन, मनसेचे डी.एम. पाटील, बसपाचे सुरेंद्र मोरे, काँग्रेसचे प्रदीपराव पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातून तीन उमेदवार
या वेळी काँग्रेसचे प्रदीपराव पवार यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य डॉ.उत्तमराव महाजन यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला व उमेदवारी पटकावली आहे. बसपाकडून सुरेंद्र मोरे यांनी उमेदवारी मिळवली आहे. हे तीन जण भडगाव तालुक्यातील असून भडगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळते की, पुन्हा पाचोरा तालुक्याकडे नेतृत्व जाते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढत असल्याने निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारतो? यावर सर्वत्र चर्चा होत आहे. उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे, पण कोण नेमके कोणाच्या पाठीशी जाते हे काळच ठरवेल.
अनेक अडचणी या कायमच
भडगाव तालुक्यातील बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तालुक्याचे ठिकाण असले तरी बर्याच बाबतीत चाळीसगाव व पाचोरा तालुक्यावर अवलंबित्व असते. यात प्रामुख्याने महसुली कामांचा समावेश येतो. स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने राजकीय नेते मंडळी निवडणूक काळापर्यंत या तालुक्याकडे लक्ष देते व नंतर दिलेली आश्वासने उडून जातात. वर्षानुवर्षे हेच चित्र असल्याचे लक्षात येते. त्यामुळे फारसा विकास होऊ शकलेला नाही.