मारियांची बदली करण्याची गरज नव्हती अरविंद इनामदार
By admin | Updated: September 11, 2015 21:57 IST
सरकारच्या निर्णयामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले
मारियांची बदली करण्याची गरज नव्हती अरविंद इनामदार
जळगाव : शिना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची बदली करण्याची आवश्यकता नव्हती, चांगली प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे स्पष्ट मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.शिना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस घेतला व कुणाला अडचणी निर्माण होतील असे वाटत होते तर त्यांच्याकडून तपास काढून सीआयडी व अन्य यंत्रणेकडे सोपविता आला असता. 15 दिवसात त्यांना पदोन्नती मिळणारच होती. 15 दिवसात त्यांना हटवून सरकारला काय मिळणार होते, असा सवाल करून सरकारच्या या निर्णयाविरुद्ध इनामदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अशा पद्धतीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे, असेही ते म्हणाले. मारिया यांची ही प्रशासकीय बदली आहे, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी या कारणाचे आपण अजिबात समर्थन करणार नाही. ही प्रशासकीय बाब होऊच शकत नाही.