जळगाव - कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमी कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांवरच अंत्यसंस्कार करण्यासाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता नेरी नाका स्मशानभूमीत सर्व प्रकारच्या कारणांमुळे मृत झालेल्या मृतांवर अंत्यसंस्कार केले जातील, असे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढले आहेत. तसेच याठिकाणी चार ओटे आता कोरोनामुळे मृत झालेल्यांचा अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले आहेत.
तर वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा
जळगाव - नगरविकास मंत्र्यांनी मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला असून, शासनाच्या निकषांमुळे हा आयोग लागू होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच आस्थापनावरील खर्चाची मर्यादादेखील ५१ टक्के असल्याने हा आयोग लागू होणे कठीण आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने वॉटरग्रेसचा ठेका रद्द करून, आस्थापनाचा खर्च कमी करता येईल, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
पावसामुळे मिळाले पिकांना जीवदान
जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील अनेक भागांमधून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्या होत्या. कोरडवाहू कापसाची लागवड करून देखील पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते; मात्र गुरुवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
उपमहापौरांचे कार्यालय १७ व्या मजल्यावर
जळगाव - महापालिकेत शिवसेनेची आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर महापौर व उपमहापौरांचे कार्यालय सतराव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आणले होते; मात्र सेनेसत्ता आल्यानंतर भाजपने घेतलेले सर्व निर्णय रद्द केले जात आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर महापौर व उपमहापौरांचे कार्यालय सतराव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आणले होते; मात्र सेनेची सत्ता आल्यानंतर महापौरांचे दालन सतराव्या मजल्यावर गेले होते. आता गुरुवारी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीदेखील आपले कार्यालय दुसऱ्या मजल्यावरून सतराव्या मजल्यावर नेले आहे.