लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : पोलिसांनी २० गुरे कुरेशी मोहल्यातून जप्त केलेली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीपाद पांडे यांनी दिनांक ३१ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळेस न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींनीही गुरे ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात कामधेनू गो सेवा मंडळ, धरणगाव यांना देखील सामनेवाले करण्यात आले होते. त्यात गोशाळेच्यावतीने अध्यक्ष ह.भ.प. सी. एस. पाटील हे हजर झाले व त्यात गोशाळेच्यावतीने ॲड. राहुल एस. पारेख व ॲड. वसंतराव भोलाणे यांनी सविस्तर युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने, ही गुरे लहान वयाची असल्याने ती शेतीउपयोगी नाहीत, अर्जदारांनी पुराव्यात सादर केलेले उतारे यावर कमी क्षेत्र असून त्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने गुरांची आवश्यकता नसते. त्यामुळे त्यांचा ताबा अर्जदार आरोपींकडे देता येणार नाही, असा निकाल दिला आहे. त्यांचा ताबा कामधेनू गो सेवा मंडळ या गोशाळेकडेच कायम ठेवण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने पारित केला.
न्यायालयाच्या अशा आदेशाने चुकीच्या गोष्टींना आळा बसेल. गावातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून गावात चर्चेचा विषय होता. आजच्या आदेशाने चर्चेला पूर्णविराम येईल.
- ॲड. राहुल पारेख.गोशाळेची बाजू मांडणारे वकील.