४१०च्यावर आरोपी : जखमींची संख्या शंभरपेक्षा जास्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाॅकडाऊन काळात संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू असतानाही जळगाव जिल्ह्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दंगलीचे तब्बल ६० गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये ४१०पेक्षा जास्त आरोपी करण्यात आले असून, जखमी व अटक केलेल्यांची संख्या शंभराच्यावर आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन लागू झाले आहे. तेव्हापासूनच संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू आहे. या काळात विनाकारण बाहेर फिरणे अपेक्षित नाही, त्याशिवाय काही महत्त्वाचे काम असेल तर पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही. असे असतानाही जळगाव शहर व जिल्ह्यात किरकोळ वादातून हाणामारीच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्यातही दोन्ही गटाची संख्या सात ते आठच्या घरात असल्याने अशा गुन्ह्यांमध्ये दंगलीचे कलम लावण्यात आलेले आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या तर दंगलीचे कलम लागू होते. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात दंगलीचे ११९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जानेवारी २६, फेब्रुवारी ३३, मार्च ३५ व एप्रिल २५ गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांमध्ये ४१०पेक्षा जास्त जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींची संख्या अजूनही वाढू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मे महिन्यातदेखील दंगलीच्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे.