मुक्ताईनगर : राज्यात विजेचे संकट गंभीर आहे. शेतकर्यांना दिवसा सलग आठ तास वीज देण्याचा प्रयत्न आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताई साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व १२ मेगा वॅटच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. यानिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, विजेवर चालणार्या पाच अश्वशक्तीच्या कृषिपंपासाठी तारा, खांब आदींचा दीड लाख रुपये खर्च येतो. विजेची स्थिती बिकट आहे. राज्यात २७00 रोहित्र खराब झाले होते. पैकी २000 रोहित्र बदलण्याचे काम सुरू झाले आहे. १९ हजार गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहू. सौर कृषिपंपांबाबत टप्प्यात पाच लाख सौर कृषिपंप बसविले जातील. पुढील पाच वर्षे हा कार्यक्रम राहील.
राज्यातील ३५ लाख विजेवर चालणार्या कृषिपंपांपैकी निम्मे कृषिपंप सौर पॉवरने सुरू करू व विजेचा भार कमी करू. केंद्रीय ग्रामीण वीज विभाग त्यासाठी सहकार्य करणार आहे, असेही ते म्हणाले.
जळगावातील प्रकल्पांसाठी पुढाकार गिरणा नारपार प्रकल्प हाती घेतला आहे. शेळगाव, पाडळसे प्रकल्पासाठी पूर्ण निधी देऊ. बोदवड उपसा योजनेसाठीदेखील शासन मदत करेल. तसेच खारीयागुटी, सातपुडा, तापी, वाघूर, गिरणा हा नदीजोड प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न असेल. मेगा रिचार्ज प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
१९ हजार गावांमध्ये पंचनामे न करता दुष्काळ जाहीर झाला आहे. पुढे केंद्रीय पथक राज्यात येणार असून, या पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळ जाहीर होईल. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राकडे ४५00 कोटींची मागणी केली आहे. ५८३ कोटी फळबागांसाठी आले आहेत. खान्देशसह इतरत्र वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याबाबत संवैधानिक अडचण आहे.
■ मुक्ताईनगरात शासकीय तंत्रनिकेतन
■ केळीसाठी रेडिएशन केंद्र आणणार
■ कापूस उत्पादकांना बोनसचा विचार
■ हवामानाच्या अंदाजासाठी राज्यात २ हजार ६५ हवामान केंद्रे उभारणार
■ अमरावती-नवापूर चौपदरीकरणाचे भूमिपूजन लवकरच
■ अवैध वीज कनेक्शन वीज जोडणीचा अर्ज भरून वैध करून घेता येणार
■ शेतकर्यांना सौर कृषिपंप देणार
■ पाडळसे, शेळगाव प्रकल्प व बोदवड उपसासाठी निधी देणार
■ नार पार गिरणा प्रकल्प मार्गी लावणार
■ जळगावात कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न