धुळे : महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी ११ कलमी कार्यक्रम प्रशासनातर्फे राबविला जाणार असून त्यासाठी सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी केले. तसेच कोणतीही करवाढ न करता स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करून सदस्यांनी सुचविलेल्या वाढीव तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे १०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर स्थायीने ४५५ कोटी १ लाख ३२ हजार ६९७ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरी दिली होती. या अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे महासभेत अंदाजपत्रकास मंजुरी घेता आली नाही. त्यासाठी मंगळवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. असा आहे कार्यक्रम वसुलीसाठी कर्मचार्यांवर भरोसा राहिलेला नाही. ते चुकीचे अहवाल सादर करतात. त्यामुळे वसुलीवर त्याचा परिणाम होतो. वसुली वाढीसाठी व उत्पन्नात वाढ करण्याकरिता ११ कलमी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे मतभेद, पक्षभेद विसरून सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य केले तर उत्पन्न निश्चित वाढेल, असा विश्वास आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामध्ये मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रत्येक विभागात दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्यात वाढीव बांधकाम, मालमत्ता कराची थकबाकी, ओपन स्पेसवर झालेले अतिक्रमण काढून त्या जागा ताब्यात घेणे, मनपाने स्वयंसेवी संस्थांना दिलेल्या जागांची चौकशी करून उद्देशाला हरताळ फासला असेल तर त्या ताब्यात घेणे, अनधिकृत बांधकाम नियमित (नियमानुसार) करण्याचे काम केले जाणार आहे. दिलेल्या मुदतीत नागरिकांनी कार्यवाही न केल्यास त्यांचे बांधकामही पाडून टाकण्यात येईल. तसेच गुंठेवारीची प्रकरणे, बांधकाम परवानगीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. कामांसाठी भेदभाव शासनाच्या निधीतून कामे देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच बिले काढताना दबाव आणला जातो. आर्थिक व्यवहार केले जातात, असा आरोप करून पारदर्शी कारभार करण्याची मागणी केली.
उत्पन्नवाढीसाठी ११ कलमी कार्यक्रम
By admin | Updated: May 21, 2014 01:21 IST