जालना : राज्यातील अंशकालीन निदेशक, तसेच अतिथी निदेशक यांच्या प्रलंबित नियुक्त्या अंतिम टप्प्यात असून, मार्चपूर्वी त्या निकाली काढू, असे आश्वासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार कला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक संघटनेसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
राज्यात अनेक वर्षांपासून कला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, सहावी ते आठवीचे अध्यापन सुरू झाले आहे. सहावी ते आठवी या वर्गासाठी कला, कार्यानुभव व क्रीडा या विषयासाठी अध्यापन करणाऱ्या निदेशकांना मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रहार कला, कार्यानुभव व क्रीडा संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू यांच्या नेतृत्वात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनामध्ये बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार, विभाग प्रमुख राजेंद्र माने, विजय बोरसे व संघटनेचे राजांबर मते, बाबूसिंग राजपूत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. निदेशकांसाठी मसुदा तयार करण्यात येत असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच आदेश निर्गमित करून हे प्रकरण निकाली काढू, अशी ग्वाहीही बच्चू कडू यांनी यावेळी दिली.
फोटो कॅप्शन : मंत्रालयात आयोजित बैठकीत चर्चा करताना राज्यमंत्री बच्चू कडू, संतोष राजगुरू, शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार व इतर.