लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : वारकऱ्यांनी गावागावात जावून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा प्रसार करून धर्मप्रचारकाची भूमिका निभावावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
राजूर येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे. यानिमित्त रविवारी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञानानंद बाबा, विठठल महाराज जगताप, गणेश देवा, भगवान महाराज यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राला साधू-संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून खेड्यातील लोकांना एकत्र आणून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे वारकऱ्यांनीसुध्दा खेड्यात जावून धर्म प्रचारकाची भूमिका निभावणे आवश्यक आहे. राजुरेश्वर संस्थानचा अलिकडे झपाट्याने विकास होत असल्याने अल्पावधीत शिर्डी, शेगाव संस्थानच्या धर्तीवर राजुरेश्वर संस्थानचा विकास करण्यास कटिबध्द असल्याचे दानवे म्हणाले. राजुरेश्वर जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वात मोठा असणारा हरिनाम सोहळा यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साेहळ्याची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचे दानवे म्हणाले.
तत्पूर्वी आप्पासाहेब पुंगळे व अर्जुन मांगडे यांच्यावतीने दानवे यांची पेढे तुला व ५०१ नारळ फोडण्यात आले. यावेळी शेषराव जायभाये, सरपंच भाऊसाहेब भुजंग, विष्णू महाराज सास्ते, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, एकनाथ महाराज, विष्णू राज्यकर, गजानन नागवे, ओंकारसिंह शेखावत, विनोद डवले, पंढरीनाथ करपे, राहुल दरक, आप्पासाहेब पुंगळे, अर्जुन मांगडे, गोरखनाथ कुमकर, भगवान नागवे, श्रीरामपंच पुंगळे, गजानन जामदार, सुदाम पुंगळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. ह. भ. प. विष्णू महाराज सास्ते यांनी सूत्रसंचालन करताना उपस्थितांचे आभार मानले.
फोटो