आर्थिक वर्ष हे ३१ मार्चला संपते. त्यामुळे वेतनधारक, निवृत्तिवेतनधारक तसेच अन्य विभागांमध्ये वेगवेगळ्या कामांवर झालेला खर्च हा बीडीएस प्रणालीवर अपलोड करून तो शासनाच्या अर्थ विभागाकडे सादर केला जातो. त्यानंतर या विभागांना अर्थमंत्रालय निधी वर्ग करून तो खर्च करण्याची परवानगी देते.
मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिकस्तर तसेच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग येथे कंत्राटदारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. मध्यंतरी बीडीएस प्रणालीला इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने ती वांरवार बंद पडण्याचे प्रकार सुरू होते. नंतर सायंकाळी ही प्रणाली सुरळीत झाल्याचे कोषागार विभागाकडून सांगण्यात आले.
बुधवारी ४ वाजेपर्यंत मुदत
विविध शासकीय विभागांना त्यांना हवा असलेला निधी तसेच खर्च झालेला निधी याचा तपशील अर्थ विभागाला सादर करावा लागतो. त्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख असते. सर्व शासकीय विभागांनी बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आपल्या विभागाचा तपशील सादर करण्याची मुदत देण्यात आली. याची दखल सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी.
सचिन धस. जिल्हा कोषागार अधिकारी, जालना