तळीरामांच्या उपद्रवामुळे पादचारी, महिला त्रस्त
जालना : शहरातील एमआयडीसी भागात, कृषिबन सोसायटी परिसरात गत काही दिवसांपासून तळीरामांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे तळीराम उपद्रव माजवत असून, याचा नाहक त्रास पादचारी नागरिकांसह महिला, मुलींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्तीच्या वेळी या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
काटेरी झुडपांमुळे चालकांची कसरत
अंबड : तालुक्यातील माहेरभायगाव ते रोहिलागड या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, चालकांनाही कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. संभाव्य धोका पाहता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काटेरी झुडपे तोडावीत, अशी मागणी होत आहे.
आगीत दीड एकर ऊस जळून खाक
अंबड : तालुक्यातील बेलगाव शिवारातील दिलीप माेताळे यांच्या दीड एकर उसाला शनिवारी सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी नामदेव तारगे, दशरथ वराडे, ईश्वर येऊल, शंकर तारगे, सूर्यकांत माेताळे, राजेंद्र मोताळे, वैजनाथ वराडे, नाना मोताळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत या आगीत शेतकरी दिलीप मोताळे यांचे मोठे नुकसान झाले.