जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) शिवारातील शेतकऱ्यांना येत आहे. गत पंधरा दिवसांपासून या भागाला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. परिणामी, पाण्याअभावी रब्बीतील पिकांना ‘शॉक’ बसत असून, ही पिके करपून जात आहेत.
गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातून खरीपातील पिके गेली आहेत. शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आशा आता रब्बीतील पिकांवर आहेत. त्यातही रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटकाही अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. अंतरवाली दायी परिसरातील संपूर्ण पिके विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुतेगाव येथील उपकेंद्रांतर्गत अंतरवाली भुतेगाव या भागातील संपूर्ण क्षेत्र आहे. परंतु, या भागाला वीजपुरवठा करणारे राेहित्र मागील पंधरा दिवसांपूर्वी जळालेले आहे. रोहित्र दुरूस्त करून द्यावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु, कर्तव्याचेच 'शॉर्टसर्किट' झालेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. गत पंधरा दिवासंपासून पाणीच न मिळाल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांचा गहू करपून जात आहे. विशेष म्हणजे जळणारी पिके पाहून या भागातील शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवर्गणी करण्याची तयारीही दर्शविली आहे. परंतु, ना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटतो ना अधिकाऱ्यांना ! याबाबत महावितरणचे उपअभियंता विपीन मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या प्रश्नाकडे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनांचा ‘फ्यूज’ टाकावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.
पाठपुरावा करून थकलो
आमच्या शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्त करून दिलेला नाही. शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवाटा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यालाही महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत.
विनोद बरसाले
शेतकरी
पिकांचे मोठे नुकसान
यापूर्वी पावसामुळे खरीपातील पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली. पिके चांगली आल्याने काहीतरी हाती पडेल, अशी आशा होती. परंतु, पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
मदन गोटे
शेतकरी,
फोटो कॅप्शन : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने अंतरवाली दायी भागातील गहू असा वाळून जात आहे.