नगरविकास मंत्री शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी जालन्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलायात आढावा बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री राजेश टोपे, आ.बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, महाज्योती संस्थेचे संचालक लक्ष्मण वडले. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जालना पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह जिल्ह्यातील तीनही पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगरपंचायतचे अधिकारी हजर होते.
प्रारंभी शिंदे यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन, ‘स्वच्छ शहर सुंदर शहरा’बाबत सीएआर निधीतून कामे करण्याचे सांगितले, तसेच शहरातील वाढते अतिक्रमण तातडीने हटवून ते पुन्हा वसणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे, मुख्याधिकारी नार्वेकर यांना दिले. वाढीव एफएसआय कशा पद्धतीने युनिफाईड डीसीआर प्रमाणे जनतेच्या हिताचा असल्याचे सांगितले. एकूणच मुंबई, पुणे येथील झोपडपट्टी विकासाचे सर्व निकष आता राज्यातील महापालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील झोपडपट्टी विकासाला लागू होतील असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरातील मोती तलाव, घाणेवाडी तलावासह शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहासाठी लागणारा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले.
रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करणार
जालना शहरात २०१६ मध्ये शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांची कामे चाळीस कोटी रूपये खर्च करून केली होती. परंतु चारच वर्षात या रस्त्यांची चाळणी झाली असून, शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे राज्य असल्याचे सांगण्यात आले. यावर शिंदे यांनी या रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करण्याचे सांगितले. तसेच अतिक्रमण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यासह आहेत, ती अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या.