वरूड (बु.) : गत अनेक वर्षांपासून ज्वारी पिकाकडे पाठ फिरविणाऱ्या वरूड (बु.) परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा जवळपास तीनशे हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली आहे. गतवर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या भागातील रब्बी ज्वारी सध्या बहरली आहे. परंतु, महावितरणने थकीत वीज बिलामुळे अचानक वीज ताेडणी मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळून रब्बीत इतर पिकांचा पर्याय शोधण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रब्बीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. पावसाने खरिपात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सुरूवातीपासून रब्बी पेरणीसाठी कंबर कसून उपलब्ध पाण्याचा कसा पुरेपूर फायदा घेता येईल. या पद्धतीने रब्बी पेरणीचे नियोजन केले होते. यामध्ये गहू, हरभरा, मका, ज्वारी, करडई आदी पिकाची जवळजवळ सातशे ते आठशे हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके देखील जोमात आहेत. मागील अनेक वर्षापासून शेतकरी ज्वारी पिकाकडे पाठ फिरवत होते. त्यामुळे या भागात ज्वारी मिळणे देखील दुरापास्त झाले होते. शिवाय ज्वारी विकत घ्यायची झाल्यास अधिक पैसे देऊन ज्वारी आयात करावी लागत असते. शेतकरी रब्बीत गहू व मकाचा पेरा वाढवीत असतो. यंदा मात्र गव्हाचे व मकाचे उत्पादन कमी करुन शेतकऱ्यांनी ज्वारी व हरभरा पिकाचा पेरा वाढविला आहे. वरूड व परिसरात ज्वारीचे पीक चांगलेच बहरले असून हे पीक कणसात आले आहे. काही ठिकाणी गहू, हरभरा सोंगणी सुरू आहे.
कोट
यावर्षी पर्जन्यमान चांगले होते. त्यामुळे कपाशी उपटून खाली झालेल्या शेतात एक एकर ज्वारीचे पिकाची पेरणी केली. सध्या ज्वारीचे पीक जोमात असून, रब्बीत इतर पिकाच्या तुलनेत ज्वारीचे पीक घेणे सोपे वाटत आहे.
विष्णू बावस्कर
शेतकरी वरूड (बु.)