लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेसची अवस्था बुडणा-या नावे सारखी झाली असून, त्याचा कॅप्टन पळून गेल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तसेच मोहन भागवत यांनी केलेल्या मॉब लिंचिंग वक्तव्याचा समाचार घेत ‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, तर दिल्ली, गुजरातसह इतर ठिकाणी झालेल्या घटना घडल्या कशा, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री जालना शहरात ओवेसी यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेवर टीका करताना खा. ओवेसी म्हणाले, सत्तेत आल्यानंतर ‘आरे’तील झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करू, असे शिवसेना सांगत आहे. मात्र, आताही शिवसेना सत्तेत आहे. तरीही कारवाई केली जात नाही. का फडणवीस यांच्या समोर शिवसेना हतबल झाली आहे, असा खडा सवालही उपस्थित केला. अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे दोघे सत्तेची वाटणी करून मिळून- मिसळून सत्ता उपभोगत असल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी एमआयएमच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवार इकबाल पाशा, सय्यद मोईन, फिरोज अली, जिल्हाध्यक्ष शेख माजेद, अॅड. सोहेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शहाआलम खान, अकबर खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:49 IST