- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आज, सोमवारी ( दि. १६ ) दुपारी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महत्वाच्या विषयावार चर्चा झाली. दोघांनीही याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मात्र, अचानक झालेल्या या भेटीने चर्चेला उधाण आले आहे.
मंत्री संजय सिरसाट यांच्या भेटी नंतर जरांगे म्हणाले की, गुवाहाटी येथील आयआयटी कॉलेजला लागलेल्या एका विद्यार्थ्यासह अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मंत्री संजय सिरसाट यांना या अडचणी दूर कराव्यात अशी विनंती केली. तसेच यावेळी मराठा आरक्षण संदर्भातही चर्चा झाली. आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना अंतरवाली सराटी येथे बोलावणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येणाऱ्या ३० जूनच्या अधिवेशनात मार्गी काढा अशी आमची मागणी आहे. यावेळी जे खासदार, आमदार, मंत्री आले ते आपले, जे नाही आलेत त्यावरून मराठा समाजाला कळलं कोण आपल अन् कोण परके.
.. तर समाज ठरवेल, जरांगेंचा इशारा३० जून ला जर मराठा आरक्षण प्रश्न मार्गी नाही काढला तर आढमूठ कोण सरकार की मराठे हे सिद्ध होणार. त्यानंतर २९ ऑगस्टला मुंबईला जाऊन धडकणार, त्यानंतर मागे फिरणार नाही. परिणाम काय होईल, आम्हाला माहीत नाही. काल सत्ताधारी अन् विरोधकांचे दहा ते पंधरा आमदार येऊन गेले. आम्ही त्यांना सांगितल, २९ जून ला अंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक आहे. त्यात सांगणार की, आम्ही एवढ्या आमदार खासदार मंत्री यांना फोन केले, त्यातील एवढे आलेत. त्यानंतर समाज बघेल काय करायचं ते, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मंत्री शिरसाट-जरांगेंच्या भेटीचे अनेक अर्थविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अडचण येत असल्यामुळे जरांगे यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने आपण जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याच संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध व्हावेत. यासाठी आपण प्रधान सचिवांना तातडीने आदेश निर्गमित करण्याची सूचना केल्याचे मंत्री सिरसाट यांनी सांगितले आहे. दरम्यान, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अडचणीसाठी भेट झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी मागील काळात अनेक आरोपानंतर मंत्री शिरसाट यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने अनेक अर्थ निघत असल्याची चर्चा आहे.