लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : कलियुगात न्यायी स्वार्थ प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. परंतु, अन्यायी वृत्ती, स्वार्थ माणसाच्या जीवनात कधीही नसावा, असे प्रतिपादन विनोदाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले.
तळणी येथे श्रीसंत सेवा तरुण मंडळाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात बुधवारी रात्री ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांचे कीर्तन झाले.
‘कलियुगात म्हणे करावे कीर्तन’ या अभंगावर त्यांनी कीर्तन केले. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घेतली जाते, त्याला न्यायी स्वार्थ म्हणतात आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, पण स्वार्थ आपलाच साधला पाहिजे, याला अन्यायी स्वार्थ म्हणतात. म्हणून, अन्यायी स्वार्थी माणसाचे घरातही नाव निघत नसते. तर, समाजात फक्त नि:स्वार्थी माणसाचे नाव कायम निघते. कलियुग हे अत्यंत कष्टतर युग आहे, असे भागवतकार म्हणतात. कलियुगात नित्यनाम चिंतन करावे. गोहत्या थांबल्या पाहिजे. पण, या देशात एकही पंचक्रोशी नाही, तिथे गोहत्या होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. श्रीराम प्रभूचे मंदिर व्हावे, यासाठी स्वइच्छेने मदतनिधी द्यावा. कोरोनाचा काळ अजून संपला नसून, दुर्लक्ष करू नका, असे आवाहनही ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले. या कीर्तन कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ, परतूर लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, हरिभाऊ देशमुख यांच्यासह भाविक उपस्थित होते.