भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मनापूर शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने मक्याची गंजी व जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील मनापूर शिवारात परसराम दळवी, मणिकराव दळवी यांची शेती आहे. परसराम दळवी यांनी काढणी करून मक्याची गंजी घातली होती. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे मक्याच्या गंजीला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग विझविण्यात यश आले नाही. या आगीत परसराम तुकाराम दळवी यांच्या शेतातील मक्याची गंजी जळून खाक झाली. शेजारी असलेले शेतकरी माणिकराव दळवी यांचा एक एकरातील मक्याचा कडबा व शेतकरी अशोक हिंमतराव दळवी यांच्या शेतातील चारा जळून खाक झाला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.