वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्य प्रकल्प यंदा १०० टक्के भरला आहे. यामुळे गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रविवारी जलपूजन करण्यात आले.
अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे गल्हाटी मध्य प्रकल्प आहे. या ठिकाणी रविवारी सकाळी १२ वाजता गल्हाटी धरण संघर्ष समितीचे सदस्य पांडुरंग गटकळ, अशोक जाधव, बाळासाहेब गव्हाणे, भागूजी मैंद, बाळू मुंडे, गणेश गावडे, राजेंद्र सोळुंके, संतोष राठोड, समितीचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या हस्ते धरणात श्रीफळ वाहून जलपूजन करण्यात आले.
गोदावरी नदीहून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सतत कोरडा असलेल्या या प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात येत होती. या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याबाबत मोठा लढा ही उभारण्यात आला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या चालढकलपणामुळे ही योजना पूर्णत्वास न जाता फक्त कागदावरच राहिली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.