पारध ते वालसावंगी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
पारध : दळणवळणाचा मुख्य स्त्रोत म्हणून रस्त्याकडे बघितल्या जाते. असे असतानाही भोकरदन तालुक्यातील पारध ते वालसावंगी या सात किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. सात किमीच्या रस्त्यासाठी तब्बल अर्ध्यातासाचा कालावधी लागत आहे. यामुळे वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पारध ते वालसावंगी फाटा हा रस्ता खान्देश व विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच वालसावंगी, धामणगाव, पिंपळगाव रेणुकाई, धाड, चिखली, माहोरा येथील व्यापारी खरेदी-विक्रीसाठी याच रस्त्याने ये-जा करतात. यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. परंतु, पारध ते वालसावंगी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे. पावसाळ््यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचतात. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
तातडीने काम करण्याची मागणी
राज्यात प्रसिद्ध असलेल्या जाळीचा देवाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील भाविकांना हाच मार्ग सोपा आहे. त्यामुळे बहुतांश जण याच मार्गाने ये-जा करतात. परंतु, रस्ता खराब झाल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी
पारध ते वालसावंगी रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत.
-----------