जालना : विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द अन् अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी. प्रेरणादायी पुस्तकेच आयुष्य बदलवून टाकतात, अशा पुस्तकांची संगत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन कवी प्रा. दिगंबर दाते यांनी गुरुवारी मकर संक्रांत व नामविस्तार दिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
मठपिंपळगाव (ता. अंबड) येथील मत्स्योदरी माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांत व नामविस्तार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल भालेकर होते. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, सुनील पवार, छगन बनकर उपस्थित होते. प्रा. दाते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाचा वेध घेण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकायचे असेल तर चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करणे क्रमप्राप्त आहे.
डॉ. सुहास सदाव्रते म्हणाले की, शालेय जीवनातील संस्कार मनावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करण्यासाठी सतत उपक्रमशील राहावे. कार्यक्रमात पुणे येथील समकालीन प्रकाशन संस्थेमार्फत देण्यात आलेला पुस्तक संच साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाला भाऊसाहेब रनमळे, विलास आरसूळ, रमेश गाढवे, संभाजी वाघुंडे, काकासाहेब जिगे, रामेश्वर टोन्पे, मंदाकिनी कदम, जयश्री वाघमारे उपस्थित होत्या.