जालना : जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत तब्बल सहा हजार ६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पहिले. त्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन दिले नाही. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्यांना मानधनच दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने तातडीने मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अडीच हजार रुपयांचे दिले जातेय मानधन
ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. हे मानधन तहसील कार्यालयाकडून दिले जाते. मानधन तीन टप्प्यांत दिले जाते. परंतु, यासाठी तहसील कार्यालयांकडे निधीच उपलब्ध नसल्याने मानधन दिले जात नाही. यंदाही शासनाने निधी न दिल्याने अधिकारी व कर्मचारी मानधनापासून वंचित राहिले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीचे मानधन मिळाले
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहा ते सात महिन्यांनंतर मानधन मिळाले आहे. परंतु, गतपंचवार्षिकला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ज्याप्रकारे शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून घेते, त्याच प्रकारे शासनाने मानधन दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन हे तहसील कार्यालयांकडून दिले जाते. त्यासाठी विशेष निधी सुद्धा असतो. परंतु, निधी प्राप्त न झाल्याने सदरील मानधन देण्यात आले नाहीत. प्रत्येकी अडीच ते तीन हजार रुपयांचे मानधन दिले जाते. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.
राजीव शिंदे, तहसीलदार