परतूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयात कार्यक्रम
परतूर : मुलींनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे, असे मत दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी व्यक्त केले. परतूर शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात ‘मुलींनी आत्मनिर्भर बनावे’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वसंत सवने, आर.टी. राऊत, टी.जी. घुगे हे होते.
पुढे बोलताना जाधव म्हणाल्या की, महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. एखादी वाईट घटना घडत असतांना आपल्याला कोणी मदत करेल, याची वाट न पाहता मुलींनी स्वत:च सशक्त व्हावे. तसेच स्वत:चे संरक्षण कसे करावे याचे धडे घेऊन वाईट प्रवृत्तीचा सामना करावा. मुलींना शिक्षण हा मोठा आधार आहे. मुली उच्च शिक्षित होऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या तर निश्चितच महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच योग्य वयातच विवाह होणे आवश्यक आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. कधी-कधी तर मुलींचे आयुष्यही यातून उदध्वस्त होते. त्यामुळे मुलींनीच पुढे येऊन बालविवाह पध्दतीचा विरोध करायला शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महिला पो.कॉ. आरती साबळे, सुरेखा राठोड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
फोटो
परतूर शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक जाधव.