चौकट
वक्त के साथ बदल जाओ... वर्णा...
ओबीची मोर्चाच्या सभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जल्लोषपूर्ण मार्गदर्शन केले. त्यामुळे पाच किलोमीटर मोर्चात पायी चालून आल्यावर आलेला थकवा दूर झाला. ऐन हिवाळ्यातही रविवारी कडक ऊन पडल्याने जो-तो सावली शोधत होता. यावेळी मार्गदर्शनात मी येथे आलो असल्याने अनेकांच्या नजरा माझ्याकडे असून काहींचे पोटही दुखणार आहे; परंतु आपण त्याची तमा बाळगत नाही. एवढा मोठा समाज माझ्या सोबत असल्याने मी याची पर्वा करत नसल्याचे सांगून त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.
चौकट
जानकर साहेब पाठ मजबूत ठेवा
रविवारी जालन्यात निघालेल्या मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग होता. माजी मंत्री आणि धडाडीचे नेते महादेव जानकर हेदेखील यावेळी सभेस हजर हाेते. यावेळी त्याांचा विशेष नामोल्लेख करून मंत्री वडेट्टीवार यांनी जानकर साहेब पाठ मजबूत ठेवा कारण पाठीवरच शाबासकीची थाप अन् खंजीरही खुपसला जातो, असे सांगून नेमकी टिप्पणी केली.
चौकट
तोपर्यंत मी मंत्री राहिलो तर...
ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आपण अनेक निर्णय घेत आहोत. आजच्या या मोर्चात मी सहभागी झालो आहे. गेल्या वर्षभरात अनेक कल्याणकारी निर्णयही घेतले आहेत; परंतु हे सर्व करत असताना माझे हितशत्रूही काही कमी नाहीत. त्यामुळे समाजाचे आणखी कल्याण करण्यासाठी माझी खूप इच्छा आहे; परंतु तोपर्यंत मी मंत्री राहिलो पाहिजे, असा उपरोधिक टोलाही मंत्री वडेट्टीवार यांनी लगावला. तसेच मी आज मंत्री म्हणून नव्हे तर समाजाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
भारतीने दमदार आवाजात मांडल्या मागण्या
मोर्चा संपून ज्याचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यावर सर्व मान्यवरांच्या सभास्थळी आगमन झाले होते. पायाची शस्त्रक्रिया झाली असतानाही गाडीतून आ. कैलास गोरंट्याल यांनी हजेरी लावली होती. तसेच यावेळी व्यासपीठावरून भारती या युवतीने तिच्या दमदार आणि तेवढ्याच पहाडी आवाजात केंद्र आणि राज्य सरकारकडे असेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवली. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.