भोकरवाडीत उपोषण
जामखेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोकरवाडी गावामध्ये उपोषण करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सरपंच कैलास घायाळ, पांडुरंग गटकळ व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
जालना शहरातील गरजूंना चादरींचे वाटप
जालना : लायन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुपच्यावतीने शहरातील जुनी औद्योगिक वसाहतीतील गरजूंना चादरी, साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र सोनी, औद्याेगिक वसाहतीचे अध्यक्ष ओमप्रकाश पंच, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, रामकुंवर अग्रवाल, गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट, कोषाध्यक्ष रामनिवास गर्ग, उपाध्यक्ष रामदेव क्षोत्रिय, संरक्षक राजेंद्र भक्कड यांच्यासह पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.
कोरोनाची लस एकदम सुरक्षित : रवींद्र बिनवडे
जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली. कोरोनाची ही लस एकदम सुरक्षित आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही लसीकरणाच्या टप्प्यात ही लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
अध्यक्षपदी बरमोटा तर कुदाल कार्याध्यक्ष
जालना : शहरातील श्री महर्षी दाधिच सेवा समितीची भगवानदास जोपट यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत निवडण्यात आलेल्या समितीत अध्यक्षपदी नारायण बरमोटा, कार्याध्यक्षपदी सुरेश कुदाल, उपाध्यक्षपदी रमेश बरमोटा, सचिवपदी अमोल नामावाल, सहसचिवपदी राहुल तिवाडी, कोषाध्यक्षपदी राजेंद्र ईनानी यांची निवड झाली. तसेच समिती सदस्यांचीही निवड झाली.
मोकाट जनावरांमुळे ज्वारीचे मोठे नुकसान
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव शिवारातील ज्वारीसह इतर पिकांचे मोकाट जनावरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. येथील शेतकरी रफिक अमिन कुरेशी यांच्या गट नंबर ४६२ मधील शेतातील शाळू ज्वारीचे पीक मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केले. यात कुरेशी यांचे मोठे नुकसान झाले असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
अजय पाटील यांना पीएचडी पदवी
भोकरदन : तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रहिवासी प्राध्यापक अजय माणिकराव पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. प्रा. पाटील हे पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात कार्यरत आहेत.
रब्बीतील तूर पिकावर माव्याचा प्रादुर्भाव
घनसावंगी : तालुक्यात यंदा रब्बीचे पीक चांगले आले आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात आजा ज्वारीवरही माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, महागडी औषधे फवारणी करीत आहेत. याकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.