जालना : शहरातील नळगल्ली परिसरात राहणाऱ्या आबड यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी शनिवारी रात्री डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज आणि दागिने लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आबड परिवारात रविवारी पुणे येथे विवाह सोहळा होता. त्यामुळे घरातील बहुतांश व्यक्ती या पुणे येथे गेल्या होत्या. ही संधी साधत चोरट्यांनी उाव साधल्याचे सांगण्यात आले.
आबड परिवार हा जालन्यातील एक नामांकित परिवार आहे. विविध उद्योग, व्यापारात हा परिवार येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्थिरावला आहे. आबड परिवार गेल्या तीन दिवसांपासून पुणे येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आबड यांच्या घराच्या मागील बाजूने वरच्या मजल्यावर प्रवेश करून जवळपास तीन ते चार खोल्यांचे दरवाजे तोडून कपाटातील रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे घराच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षारक्षक होते. ते समोरील बाजूस होते. त्यामुळे चोरट्यांनी आबड यांच्या घरात पाठीमागून प्रवेश करून हा डल्ला मारला. सकाळी ज्यावेळी वरच्या घरांमध्ये लाइट सुरू असल्याचे दिसून आल्याने ही चोरी झाल्याचे उघड झाले. चोरीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, सदरबाजार ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लगेचचे ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी आबड यांनी तक्रार दिली नव्हती.