जालना : गत दहा महिन्यात एकही वीज बिल न भरणारे जिल्ह्यात तब्बल ६० हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७४ कोटींची थकबाकी असून, या ग्राहकांनी थकीत वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले होते. मार्च ते जूनपर्यंत सुरळीत वीज पुरवठा ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या १० महिन्यांच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला नाही. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेचा मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहकांनी थकीत बिले भरणे गरजेचे आहे. दर महिन्यात होणाऱ्या वीज बिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दरमहा वीज खरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी, येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीज पुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वेळेत वीज बिले भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.