मध्य पूर्वेवर युद्धाचे ढग दाटले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून (२५ फेब्रुवारी) दोन दिवसांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे, संपूर्ण जगाचे, विशेषतः अरब राष्ट्रांचे लक्ष लागले आहे. इस्रायलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "आपण द्विपक्षीय चर्चा आणि भारत-इस्रायल मैत्री अधिक घट्ट करणाऱ्या अर्थपूर्ण निकालांची वाट पाहत आहोत."
पाकिस्तानच्या पोटात गोळा -मोदींचा हा दौरा पाकिस्तानसाठी 'धोक्याची घंटा' असल्याचे पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने म्हटले आहे, १९९२ मध्ये संबंध बहाल झाल्यानंतर मोदींच्या काळात दोन्ही देश अधिक जवळ आले आहेत. "ऑपरेशन सिंदूर'मध्ये इस्रायलने पाकिस्तानविरुद्ध डिफेंस स्ट्रॅटजीच्या स्वरुपात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावाही डॉनने केला आहे." जिओ न्यूजने तर या दौऱ्यावर विशेष शो करत पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नाव होते, 'पीएम मोदी का इजरायल दौरा पाकिस्तान के लिए खतरे की घंटी.'
का दणाणलेय इस्लामिक देशांचे धाबे? -पंतप्रधान मोदींच्या इस्रायल भेटीपूर्वी, नेतान्याहू यांनी हेक्सागन अलायन्सचा उल्लेख केला होता, यावर पाकिस्तानी माध्यमांनी चिंता व्यक्त केली आहे. शिया आणि सुन्नी यांना धोकादायक म्हणत, नेतान्याहू यांनी भारत, ग्रीस, सायप्रस आणि काही अरब, आशियाई आणि आफ्रिकन देशांसह एक गट स्थापन करण्यासंदर्भात भाष्य केले होते. पाकिस्तानच्या संसदेने मंगळवारी (२४ फेब्रुवारी २०२६) नेतन्याहू यांच्या या विधानाविरुद्ध ठरावही मंजूर केला आहे.
'मिडल ईस्ट मॉनिटर'ने म्हटले आहे, २०१८ पासून भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन संबंधांना वेगळे करून बघण्यास सुरुवात केली आहे. भारत पॅलेस्टाईनला पाठिंबा देत असला तरी, इस्रायलसोबतची त्याची भागीदारीही अधिक बळकट करत आहे. 'अल जझीरा'ने म्हटले आहे, भारत चीननंतर आशियातील इस्रायलचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तसेच दोन्ही देश इस्लामी दहशतवादाला समान धोका मानतात.