एककीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला आणि दुसरीकडे दहशतवादाचे तळ अशी जागतिक ओळख असलेला पाकिस्तान सध्या स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यात ऐतिहासिक भूमिका बजावल्याचा दावा करत, पाकिस्तानने आता चक्क तीन नोबेल शांतता पुरस्कारांची मागणी केली आहे. पंजाब प्रांताच्या विधानसभेत यासंदर्भातील अजब प्रस्ताव मांडण्यात आला असून, यामुळे जागतिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
तीन नावांचा अजब प्रस्ताव
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे मुख्य प्रतोद राणा मोहम्मद अर्शद यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला. यामध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार या तिघांनाही नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांच्या प्रभावी मुत्सद्देगिरीमुळेच जगावरील तिसऱ्या महायुद्धाचे संकट टळले, असा अजब दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे.
'ग्लोबल पीसमेकर'चा आव
प्रस्तावात म्हटले आहे की, इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव जागतिक शांततेसाठी गंभीर धोका बनला होता. मात्र, पाकिस्तानच्या या तिन्ही नेत्यांनी मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणला. पाकिस्तानने एक शांतीप्रिय राष्ट्र म्हणून जगासमोर सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे, त्यामुळे या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय दखल घेऊन त्यांना नोबेलने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी पंजाब विधानसभेने केली आहे.
आर्थिक संकट विसरले, नोबेलच्या स्वप्नात रंगले!
पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक मंदी, महागाई आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. मात्र, या अंतर्गत समस्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला 'शांतता दूत' म्हणून सादर करण्यात व्यस्त आहे. ज्या देशावर अनेकदा दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप होतात, तोच देश आता शांततेचे धडे जगाला देऊ पाहत असल्याने सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर टीका आणि मिम्स व्हायरल होत आहेत.