नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानांची जाळपोळ केली असून संसदेवरही हल्ला केला आहे. तीन दिवसानंतरही तेथील परिस्थिती अजूनही सुधारत नाही. सरकारविरोधी निदर्शनांच्या नावाखाली, गुन्हेगारांना संधी मिळाली आहे. गुरुवारी, काठमांडूजवळ भारतीय प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केला आणि प्रवाशांचे सामान लुटले.
या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधील बहुतेक लोक आंध्र प्रदेशचे होते. ते काठमांडूमध्ये पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन भारतात परतत होते. बस क्रमांक यूपीचा होता.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आधी बसवर दगडफेक केली आणि नंतर प्रवाशांचे मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्यास सुरुवात केली. बसमधील किमान ८ प्रवासी जखमी झाले आहेत. नेपाळी लष्कराच्या जवानांनी प्रवाशांना मदत केली. त्यानंतर भारतीय दूतावासांना माहिती देण्यात आली. सर्व प्रवाशांना काठमांडूहून विमानाने दिल्लीला आणण्यात आले. हल्ला झाला तेव्हा त्यांची बस उत्तर प्रदेशातील महाराजगंजजवळील सोनौली सीमेवर पोहोचली होती, अशी माहिती चालकाने दिली.
चालक राज यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी बसचा एकही काच ठेवली नाही. नेपाळमधील बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही राज्यांमध्ये, नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. भारतात अडकलेल्या नेपाळी नागरिकांना पडताळणीनंतर परत पाठवले जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकही हळूहळू परत येत आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने व्यवस्था केली आहे.
नेपाळच्या तुरुंगातून कैदी पळून गेले
नेपाळच्या तुरुंगातून पळून जाऊन भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ६० संशयित नेपाळी कैद्यांना भारत-नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलच्या जवानांनी पकडले.
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील भारत-नेपाळ सीमेवर एसएसबीच्या जवानांनी या संशयित नेपाळी कैद्यांना पकडले. भारत-नेपाळ सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली एसएसबी या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर आहे.