गेल्या दोन दिवसांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये पाकिस्तानात झालेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे खैबर पख्तुनख्वा भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. प्रादेशिक आपत्ती निवारण प्राधिकरणाने शनिवारी सकाळपर्यंत ३०७ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा आहे. अनेक लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, हा मुसळधार पाऊस २१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये आलेल्या दुर्घटेसाठी ढगफुटी, वीज पडणे, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्ती कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपासून तीन तासांच्या अंतरावर असलेला बुनर जिल्ह्याला या आपत्तींचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तसेच येथे १८४ जणांच मृत्यू झाला आहे.