हिंगोली : मागील वर्षभरापासून कोरोना आजाराचे रूग्ण वाढत् आहेत. कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रातील घटकांना फटका बसला आहे. याचा परिणाम अनाथ, निराधारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थानाही बसत आहे. अनाथ, निराधाराचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे १९ निरीक्षण गृहाची तर ३ बालसंगोपन गृहाची नोंद झाली होती. मात्र सध्या दोनच निरीक्षण गृह कार्यरत आहेत. यामाध्यमातून विधी पीडित, अनाथ, वाममार्गाला लागलेल्या बालकांना सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. या बालगृहाला शासनाकडून मदत दिली जाते. परंतु, शासनाची एक रूपयाचीही मदत न घेता अनाथ, निराधार, वृद्ध, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था कार्य करतात. या संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना काम करताना उर्जा मिळत होती. यातील निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत आहे. मात्र मागील एक वर्षापाासून देशभरात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकांनाच घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. निराधार, अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्थासमोर तर मोठा प्रश्न उभा राहत आहे. कोरोनामुळे दानशूर व्यक्तीकडून मिळणारी मदतीचा ओघ आटल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना खर्च भागविताना काटकसर करावी लागत आहे.
बालकांच्या संगोपनासाठी निधीची अडचण
साथ फाऊंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची व ऊस तोड कामगारांची ४० मुले आहेत. त्यांच्या शिक्षण व संगोपनाचा महिन्याकाठी किमान १ लाख रूपयांचा खर्च येतो. हा खर्च दानशूर संस्था, व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून भागविला जात होता. तसेच व्याख्यानातूनही मदत मिळत होती. मात्र कोरोनामुळे मदतीचा ओघ आटला आहे. व्याख्यान कार्यक्रमही होत नाहीत. त्यामुळे येणारी मदत आटली आहे. परिणामी खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
निरीक्षण गृहातील मदत आटली
जिल्ह्यात सध्या दोनच निरीक्षण गृह कार्यरत आहेत. हिंगोली येथील सरस्वती मुलींचे निरीक्षण गृहात सध्या २० बालके आहेत. या बालकांचा खर्च शासन भागवित आहे. या निरीक्षण गृहातील बालकांसोबत आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करून दानशूर व्यक्ती बालकांना खाऊ, कपडे, शैक्षणिक साहित्याची मदत देत होते. यातून बालगृहातील बालकांचे मन रमत होते. व वेगळा आनंद मिळत होता. मात्र कोरोनामुळे दानशूर व्यक्तीकडून होणारी मदत आटली आहे. खानापूर चित्ता येथील श्री स्वामी समर्थ बालगृहात १६ बालके आहेत.
प्रतिक्रिया...
साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून व लोकसहभागातून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगार, निराधार आदी मुलांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनापूर्वी दानशूर व्यक्ती मदत देत होते. मात्र कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाला आहे. परिणामी बालकांचे संगोपन करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- मीरा धनराज कदम, साथ फाऊंडेशन संस्थाचालक
निराधार, अनाथ, अत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांच्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. निस्वार्थ सेवेतून कार्य करीत असले तरी बालकांचे संगोपन करण्यासाठी मोठा खर्च येतो. दानशून व्यक्तींनी मदत केली तर ह्या संस्था टिकण्यास मदत होते. तसेच बालकांना शिक्षण, निवारा मिळून चांगले जीवन जगण्यासाठी मदत होते.
- चंद्रकांत पाईकराव, सामाजिक कार्यकर्ते