कळमनुरी : शहरात मागील १५ दिवसापासून चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे नागिरकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.
महिनाभरापूर्वी कळमनुरी शहराला दोन दिवसाआड पाणी यायचे. परंतु, गत १५ दिवसापासून चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कळमनुरी शहराला इसापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १५ दिवसापासून उन्हाचा पारा वाढला आहे. अशा भर उन्हात नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. शहरातील पाण्याची टाकी साडेआठ लाख लिटरची आहे. सदरील टाकी पूर्णपणे का भरली जात नाही, हाही मोठा प्रश्न आहे. वेळोवेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, उन्हाळा संपत आला तरी पाण्याचा प्रश्न काही मिटलेला दिसत नाही. पाण्यासारखा गंभीर प्रश्न कोणताच अधिकारी कसा काय मनावर घेत नाही, हेही मोठे कोडेच म्हणावे लागेल. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना शहरातील पाण्याची टाकी पूर्णपणे भरण्यास सांगावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
कळमनुरी शहराला इसापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. इसापूर धरणाच्या जवळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या विद्युत मोटारी बसविलेल्या आहेत. या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगर परिषदेची पाण्याची टाकी भरत नाही.