रस्त्यालगतचे रोहित्र उघडेच
हिंगोली : शहर तसेच परिसरातील विद्युत रोहित्र हे रस्त्यालगतच बसविण्यात आलेले आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणचे रोहित्र हे झाकणाविनाच आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी धोका होण्याची संभावना आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन विद्युत रोहित्रांना झाकण बसविणे गरजेचे झाले आहे.
जनावरांना उघड्यावर बांधू नये
हिंगोली : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे व पावसाची शक्यता लक्षात घेता निवाऱ्याच्या ठिकाणीच जनावरांना बांधावे. जनावरे पावसात भिजणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. गोठ्यावर उसाचे पाचट किंवा तुराट्याचे अच्छादन करावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्याठाच्या कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
चारा योग्य ठिकाणी ठेवण्याचे आवाहन
हिंगोली: १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता असल्याने जनावरांचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कडबा पावसात भिजल्यास जनावरे कडबा खात नाहीत. त्यामुळे कडब्याची योग्य प्रकारे सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
डाळिंबावर फवारणी करावी
हिंगोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता उत्पादकांनी फळांची काळजी घेणे गरजेचे आहे. बागेमध्ये मोडलेल्या फाद्यांची छाटणी करून त्यावर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.