हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर परिषदेच्या पथकाने ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे पाहून नगर परिषद पथकाने कारवाईची मोहीम जोरात सुरु केली आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरातील तीन ठिकाणी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला. यामध्ये यशवंतनगर येथील स्टडी सर्कलला ५ हजार रुपये, रिसाला बाजार येथील किराणा दुकानाला १ हजार रुपये आणि जवाहर रोडवर विनामास्क फिरणाऱ्याला २०० रुपये दंड आकारला.
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन काही नागरिक करत आहेत. टाळेबंदी असतानाही दुकाने बिनधास्तपणे उघडली जात आहेत. विनाकारण, विनामास्क काहीजण फिरत आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यत कारवाईची मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के यांनी दिली.