शहरातील भाजी मंडईत शेवगा, कारल्याला आला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:17+5:302021-02-15T04:26:17+5:30
जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. ...
जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. भाजीपाल्यांना भाव कमी मिळू लागल्याने उत्पादकांना मात्र आर्थिक फटका बसू लागला आहे. रविवारी मंडईत भाज्यांची आवक कमी झाल्याने, रविवारी हिरवी मिरची ४० रुपये किलो, शेवगा ५० रुपये किलो, सिमला मिरची ४० रुपये किलो, कारले ५५ रुपये किलोने विक्री झाले. आलू, फुलकोबी, पानकोबी, गाजर, टोमॅटो, काकडी, कडीपत्ता, दोडके आदी भाज्यांची आवक जास्त होती. त्यामुळे या भाज्या स्वस्त दरात ग्राहकांना मिळाल्या. यामुळे ग्राहकवर्ग समाधानी असल्याचे पाहायला मिळाले.
भाज्यांची आवक गत दोन-तीन आठवड्यांपासून वाढलेली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त दरात मिळू लागल्या आहेत. २० रुपये पाव किलो मिळणारे आलू आता सहा रुपये किलोने मिळू लागले आहेत.
- बाबाराव सुरुशे, ग्राहक
सद्य:स्थितीत सर्वच फळांची आवक कमीच आहे, दुसरीकडे ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. फळांची आवक वाढल्यास त्याचे दरही कमी होतील.
- अ.खदीर बागवान, फळविक्रेते, हिंगोली
गत महिनाभरापासून भाज्यांची आवक वाढलेली पाहायला मिळत आहे. काही भाज्यांची आवक कमी झाल्याने त्या महागल्या आहेत. सध्यातरी पाणी भरपूर आहे.
- मुरलीधर कदम, भाजीपाला विक्रेता, हिंगोली
शहरातील किराणा बाजारात चढ-उतार कमी-जास्त होत आहे. चणाडाळ ६० रुपये किलो, तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ८० रुपये किलो, तांदूळ ५५, गूळ ४० रुपये किलो, साखर ३८ रुपये किलोने विक्री झाली असल्याचे किराणा व्यापारी फैजान शेख यांनी सांगितले.
गत आठवड्यापासून शहरात फळांची आवक कमी झाली आहे. सफरचंद १४० रुपये किलो, संत्रा ५० रुपये किलो, अननस ६० रुपये नग, केळी ३० रुपये डझन, स्ट्राॅबेरी ६० रुपये या प्रमाणे विक्री झाले. आवक वाढल्यास फळे स्वस्त होतील, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.