राज्यात गतवर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही काळ आधी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आणि शाळा बंद पडल्या. सतत शाळा बंद राहात असल्याने मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत तर तिसऱ्या लाटेचा धोका दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना जास्त असल्याचे तज्ज्ञांचे अनुदान आहे. त्यामुळे सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
हे वर्ग सुरू करताना गाव कोरोनामुक्त आवश्यक असून पालकांशी चर्चा करून ठराव घ्यायचा आहे. तर शाळेत टप्प्याटप्प्यात मुलांना बोलावयाचे आहे. जसे की वर्गांना बदलीच्या दिवशी अथवा सकाळ व दुपार सत्रात बोलवावे. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शाळेत हात धुण्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, क्वारंटाईन सेंटर असल्यास ते इतरत्र हलविणे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, मास्कच्या वापराची सूचना दर्शनीभागात लावणे, थुंकण्यावरील बंदीचे काटेकोर पालन करणे, रांगेत उभे राहण्यासाठी सहा फुटांच्या अंतराची आखणी करणे, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, कुटुंबातील व्यक्तींनी नियमित वाफ घ्यावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. शाळेत शक्यतो वैयक्तिक वाहनाने विद्यार्थ्यांना आणून सोडावे, चालक, वाहक व विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी, वाहनाच्या खिडक्या उघड्या असाव्यात, मुलांच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या काळात अंतर राखले जावे, प्रात्यक्षिक व इतर कार्य लहान गट करून घ्यावे, मुलांनी साहित्याची अदलाबदल करू नये, अशा सक्त सूचना द्याव्यात, वर्ग खुल्या परिसरात घेतल्यास अधिक उत्तम असेही सांगण्यात आले तरीही कोणी संशयित आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे, मुख्याध्यापकांनी कोविड सेंटरची माहिती व क्रमांक मोबाईलमध्ये ठेवावी, असेही सूचित केले.
शिक्षकांनी त्याच गावात राहावे
ठराविक विषयांसाठी प्राधान्य देण्यास सांगितले आहे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी, असे विशेषत्वाने नमूद केले. तर शाळेत आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाळायच्या आहेत.
९ वी ते १२ वीच्या एकूण शाळा ३२६
अंदाजित शिक्षक व कर्मचारी ३५००
वर्गनिहाय विद्यार्थी
आठवी २०७४०
नववी २०५३५
दहावी १९५१९
अकरावी१२६५७
बारावी १३३८७
शासनाने आज शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांसह निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी