यंदा जिल्ह्यातील ७५ टक्के पेरण्या सध्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीची पेरणी ३६४६ हेक्टर, मका ६१३ हेक्टर, तूर ३८ हजार ९३१ हेक्टर, मूग ६८४४ हेक्टर, उडीद ५२९७ हेक्टर, सोयाबीन २.४१ लाख हेक्टर, कापूस २५ हजार ६५१ हेक्टर तर हळद ४० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४.२४ लाख हेक्टर असून ३.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. मात्र मागील महिनाभरात दुसऱ्यांदा पावसाने ओढ दिली आहे. यापूर्वी अशीच नेमकेच पीक अंकुरले असताना दहा दिवसांची ओढ दिली होती. आता पुन्हा पिके वाऱ्यावर डोलत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने माना टाकत आहेत. हलक्या जमिनीतील पिके तर आणखी तीन दिवसही तग धरतील की नाही, अशी परिस्थिती आहे. जर आता पिके हातची गेली तर दुबार पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाणाचा मोठा प्रश्न आहे. शिवाय खतेही मिळतील की नाही, याची शंका आहे. यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
सोयाबीनचा पेरा वाढला
दरवर्षीप्रमाणेच यंदाही साेयाबीनचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी २.२५ लाख हेक्टर म्हणजे १४३ टक्के पेरणी केली आहे. या पिकाकडील शेतकऱ्यांचा कल दरवाढीमुळे कायम राहिल्याचे दिसत आहे.
... तर दुबार पेरणी
यंदा शेतकऱ्यांना पेरणी केल्यापासून दुसऱ्यांदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यावेळी मात्र दिवसभर कडक ऊन पडत असून, कधीतरी ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे पिके वाळून जाण्याची भीती आहे. अधून-मधून कुठेतरी पाऊस पडत असला तरीही सर्वत्र नाही.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस
तालुका पाऊस पेरणी
हिंगोली २५२ मि. ७५३९८
कळमनुरी २५४ ५४००५
वसमत २३५ ५९३४७
औंढा ना. २८९ ५३९८८
सेनगाव २४१ ७९७१२
जिल्ह्यातील सध्याची स्थिती
आजपर्यंत अपेक्षित पाऊस २३० मिमी
प्रत्यक्ष झालेला पाऊस २५१ मिमी
आतापर्यंत झालेली पेरणी ३२२४५० हे.